
कोल्हापूर, दि 24 : (जिमाका) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने सन २०२६ साठी ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ या पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपली नामांकने ४ मे पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी केले .
मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे व मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाने ही पुरस्कार योजना गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे.
या योजनेंतर्गंत मधमाशीपालन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशा क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका पुरस्काराचे आरक्षण महिला मधपाळासाठी ठेवण्यात आले आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ११ , द्वितीय ७ तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये इतकी आहे.
२० मे रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’च्या औचित्याने पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. नामांकन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mskvib.org वर उपलब्ध असून, संबंधित जिल्ह्यातील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयातही अर्ज मिळू शकतात.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, कोल्हापूर (दूरध्वनी : ०२३१-२६५१२७१) किंवा संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी : ०२१६८-२६०२६४) यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.
0000